
मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बसरण्याचा तसेच त्यासोबतच ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
आज म्हणजे ३१ मार्च रोजी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाट माथ्यांवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उद्या (१ एप्रिल) रोजी, ठाणे, रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागने पावसाचा यलो अलर्ट जारी केली आहे.
सध्या जिल्ह्यात अनेक भागांत ढगाळ वातावरण असून प्रचंड उकाडा वाढला आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे कोकणातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान पावसाच्या शक्यतेमुळे कोकणात काढणी केलेला आंबा, काजू बी, कडधान्ये, व सुपारी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या वतीने सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज या पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.



