
रत्नागिरी : पहलगाम, काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील ६१ पर्यटकांशी संपर्क झाला असून, सर्व पर्यटक सुखरूप व सुरक्षित आहेत. त्यापैकी २ प्रवासी आज (२४ एप्रिल) दाखल झाले आहेत. प्रयास टुरिझमने काश्मीर येथे गेलेले ८ प्रवासी हे आज विमानाने मुंबईला येत असून, उद्या (२५ एप्रिल) रोजी संध्याकाळपर्यंत रत्नागिरीमध्ये दाखल होतील. यात चिपळूणमधील सातजणांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
अमृता ट्रॅव्हल्सने काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले ६ प्रवासी हे २५ एप्रिल रोजी विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत. तसेच श्री टुरिझमने काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले ३४ प्रवासी २६ एप्रिल रोजी रत्नागिरीत पोहचणार आहेत. तसेच खेडशी येथील ६, गयाळवाडी येथील ३ आणि डफळवाडी येथील २ असे एकूण ११ प्रवासी २८ एप्रिल रोजी रत्नागिरीत पोहचणार आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षामधून सर्व पर्यटकांना संपर्क झाला असून, ते सर्वजण सुखरूप आणि सुरक्षित आहेत.



