जीजीपीएसमध्ये विद्यार्थ्यांनी साजरे केले दीपपूजन

रत्नागिरी : आषाढ महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या अमावस्येला ‘दीप अमावस्या’ असे म्हटले जाते. या अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. या दीपपूजनाने श्रावणाचे स्वागत केले जाते. जीजीपीएसच्या स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनीही दीप पूजनाने श्रावणाचे स्वागत केले. विविध पद्धतीचे दिवे लावून, रांगोळी काढून, फुलांची सजावट करून दीपपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दीपपूजनाचे महत्त्व सांगून दीपपूजनाची प्रार्थना म्हणण्यात आली. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने सर्वत्र प्रकाशमय आणि चैतन्यमय वातावरण तयार झाले. या चिमुकल्यांच्या भविष्याचा प्रवास असाच प्रकाशमय राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत हा दीप पूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या सौ. अपूर्वा मुरकर, प्री प्रायमरी विभागाच्या सौ. शुभदा पटवर्धन, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



