ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलमध्ये कारगिल विजय दिवस साजरा
ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुल व रा. भा. शिर्के प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात माजी सैनिकांची उपस्थिती

रत्नागिरी : ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलमध्ये २५ जुलै रोजी कारगिल विजय दिवस माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला. माजी सैनिकांचे स्वागत प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. पी. एस. कांबळे यांनी केले. यावेळी माजी सैनिक संतोष शिरसाट (एअर फोर्स ३९ वर्षे सेवा सेवा), संतोष कांबळे, विष्णू जाधव, विजय कदम, शिवाजी पाटील, संजय भडकमकर (भारतीय नौदल सध्या रत्नागिरी जिल्हा परिषद येथे कार्यरत), विजय आंबेकर (ऑपरेशन ब्लू, भारतीय सैन्य दलात ३ सुवर्णपदक) हे उपस्थित होते.
यामधील नितेश शिरसाठ हे प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभागी झाले होते. त्यांनी युद्धात घडलले अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. या सर्व मान्यवर सैनिकांनी आपले पूर्वानुभव विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांचे त्यांच्या देशसेवेतील पूर्वानुभव ऐकून विद्यार्थी थक्क झाले. या सर्व मान्यवरांनी त्यांनी कोणकोणत्या युद्धामध्ये सहभाग घेतला होता याची विस्तृत माहिती सांगितली. त्यांनी सांगितलेल्या अनुभवातून त्याच्याप्रती देशाबद्दल असणारी जाज्वल्य देशभक्ती, राष्ट्रप्रेम, देशाभिमान याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली. त्यांनी सांगितलेले युद्धातील प्रसंग हे जिवंतपणे उभे राहिले. हे सर्व ऐकताना विद्यार्थी भारावून गेले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील प्रश्न ह्या सर्व मान्यवरांना विचारुन आपल्या शंकाचे निरसन केले. यामध्ये सैन्यात भरती होण्यासाठी कोणकोणत्या परीक्षा कोणती शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करून घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निवळकर यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुल प्रमुख श्री. सनगरे यांनी केले. या कार्यक्रमाला गुरुकुलातील शिक्षकवृंद श्री. रसाळ, श्री. पिलणकर, सौ. करकरे, सौ. भोळे, श्री. फटकरे उपस्थित होते. शेवटी श्री. निवळकर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.



