रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून रिक्त पदांचा आढावा

रत्नागिरी : सर्वच विभागांनी रिक्तपदांची भरती करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी. अनुकंपा मधून भरती करण्याबाबत प्राध्यानाने काम करावे. नगरपालिका, नगरपंचायत यांनी लाड पागे समितीनुसार रिक्त पदांची भरती करावी. सर्वच विभागांनी रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत सर्वच विभागांची विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आदी उपस्थित होते.
१५० दिवस कार्यक्रमांतर्गत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी रिक्त पदांबाबत माहिती दिली. यावेळी पालकमंत्री डॉ. सामंत विविध विभागांच्या प्रमुखांकडून कार्यालयात असणाऱ्या रिक्त पदांबाबत सविस्तर आढावा घेतला. ही पदे भरली जातील याबाबत कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.


