पाचल-टक्केवाडी येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू
जिल्हा पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

राजापूर : पाचल येथे टक्केवाडी येथील राहणाऱ्या श्रीमती वैशाली शांताराम शेटे (वय ७४) या वृद्ध महिलेचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पदरित्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तात्काळ भेट दिली.

ही घटना काल (१५ ऑक्टोबर) उघडकीस आली होती. दरम्यान, लांजा – राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि तसेच श्वान पथकासह, फॉरेन्सिकची टीम आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक अमित यादव राजापूर पोलीस ठाणे हे उपस्थित होते.

वैशाली शेटे या त्यांच्या घरी एकट्याच रहात होत्या. तसेच त्यांना सोमवारी वाडीमधील ग्रामस्थांनी पहिले होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र नंतर त्या काही दिसल्या नव्हत्या. त्यामुळे बुधवारी सकाळी वाडीतील एका महिलेने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला असता काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जोरात दरवाजा लोटला असता तो उघडला आणि आतील प्रकार समोर आला. त्यावेळी घरात श्रीमती वैशाली शेट्ये या मृतावस्थेत आढळून आल्या.

दरम्यान, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल होण्याच्या अनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन मार्गदर्शन केले.



