शिवशंभू मित्र मंडळाने साकारलेल्या विजयदुर्ग किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

रत्नागिरी : दीपावली सण संपल्यानंतर येणाऱ्या आणि विशेष धार्मिक महत्त्व असलेल्या कार्तिक पौर्णिमेच्या, म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शहरातील छत्रपती नगर, साळवी स्टॉप येथे शिवशंभू मित्र मंडळाने आयोजित केलेला दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात झाला. हा दीपोत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून, तो शिवभक्ती, ऐतिहासिक वारसा आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा जागर होता.
भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार, कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरे केले जाते. याच दिवशी भगवान महादेवाने त्रिपुरासुराचा वध करून तिन्ही लोकांवर विजय मिळवला होता. हा विजयोत्सव म्हणून साजरा करण्याची आणि या दिवशी शिवमंदिरात दिवे लावून महादेवाची कृपादृष्टी प्राप्त करण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. हिंदुस्थानातील लाखो शिवमंदिरांमध्ये याच भावनेतून दीप प्रज्वलित केले जातात. याच परंपरेचा सन्मान राखत, ‘ज्या गड-किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पाऊल पडले आहे, तेथे असलेले शिवमंदिर हे आपले प्रेरणास्थान आहे’ ही उदात्त भावना मनात ठेवून शिवशुंभु मित्र मंडळाने हा विशेष सोहळा आयोजित केला.

प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने दीपावलीनिमित्त ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याची भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती साकारली होती. या कलात्मक प्रतिकृतीवरच दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या साकारलेल्या किल्ल्यावर, पारंपरिक शिवमंदिराप्रमाणेच भाविकांनी मोठ्या संख्येने पणत्या आणि दिवे लावले.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या सायंकाळी शिवशंभू मित्र मंडळाच्या वतीने या विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रतिकृतीवर ‘भव्य दीपोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शेकडो दिव्यांची रोषणाई करण्यात आली. दिव्यांच्या या तेजस्वी माळेने संपूर्ण किल्ला परिसर आणि छत्रपती नगर परिसर तेजाने न्हाऊन निघाला होता.



