मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मनसेचे माजी गुहागर संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा भाजपात प्रवेश

आबलोली (संदेश कदम) : काताळे गावातील सुपुत्र व डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपाचे कमळ हाती घेतलं. यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, जुनी डोंबिवली मंडळ सरचिटणीस मयुरेश शिर्के, महेश पांचाळ आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेश कदम हे मनसे स्थापनेपासून राज ठाकरे यांचे निष्ठवंत कार्यकर्ते म्हणून सक्रिय राजकारणात कार्यरत होते. त्यांच्या कार्याची दखल घेत राज ठाकरे यांनी गणेश कदम यांना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. राज ठाकरे यांच्या विचारावर आणि आपल्या कार्याच्या जोरावर त्यांनी गुहागर तालुक्यात कार्यकर्त्यांना एकत्र करून पक्ष बांधणी सुरु केली त्याचाच भाग म्हणून राज ठाकरे यांनी गणेश कदम यांना २०१९ च्या विधानसभेला शिवसेनेचे जेष्ठ आमदार व बलाढ्य उमेदवार भास्करशेठ जाधव यांच्या विरोधात आमदारकीचं तिकीट दिलं. गणेश कदम यांची आर्थिक परिस्थिती भक्कम नसली तरी त्यांनी ती निवडणूक मोठ्या हिम्मतीने लढली.

नंतर डोंबिवली शहर सचिव पदावरही काही काळ काम केले. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत लढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी मनसेच्या डोंबिवली शहर सचिव पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देऊन जरांगे समर्थक म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला.

मराठा आरक्षणासाठी वर्षभर साथ दिल्यानंतर मनसेची नवीन सदस्य नोंदणी चालू होताच पुन्हा मनसेचे सदस्यत्व स्वीकारून मनसेत सक्रिय झाले. परंतु नुकतेच गणेश कदम यांनी पुन्हा मनसेला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांच्या संघटन कौशल्याचा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल असं मतं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व जोमाने काम करण्याचा सल्ला दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!