मुख्य बातमी

रत्नागिरी रेल्वे स्थानकाला सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका; छताचा काही भाग अचानक कोसळला

रत्नागिरी : शहरात सध्या पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने थैमान घातले आहे. याचा फटका नव्यानेच बनविण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसला आहे. रात्री पावणे अकराच्या सुमारास पावसासह आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकातील छत कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे रेल्वे स्थानकाचा रिक्षा स्टँडकडील काही भाग अंधारात बुडाला आहे. छत कोसळले त्या ठिकाणी अनेकजण पाऊस आला म्हणून आश्रयास थांबले होते; मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाल्याची घटना घडली नाही.

कोट्यावधी रुपये खर्च करून एखाद्या विमानतळाला शोभेल अशा थाटात रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र हे काम करताना येथील परिस्थितीचा फारसा विचार न केल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. येथील पाऊस आणि सोसाट्याचा सुटणारा वारा यांचा फारसा विचार न केल्याने रेल्वे स्थानकाचे काम सुरू असतानाच अनेकदा छत कोसळल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

आजही (५ जुलै) रात्री पावणे अकराच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रेल्वे स्थानकातील छत अचानक कोसळले. काही सेकंदात घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. छत कोसळल्यामुळे स्थानकाचा काही भाग अंधारात बुडाला आहे.

पाऊस आल्यामुळे अनेकजण पावसापासून वाचण्यासाठी या छता खाली उभे होते. मात्र सावध असल्यामुळे छत कोसळत असल्याचे निदर्शनास येताच सर्वच तातडीने त्या ठिकाणाहून बाजूला झाले. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली आहे; मात्र या घटनेमुळे रेल्वे स्थानकाच्या केलेल्या नूतनीकरणाच्या कामाच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!