जानवळे ओझरवाडी येथे नवीन साकवासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मनसेच्या वतीने विनोद जानवळकर यांचा पुढाकार

गुहागर : तालुक्यातील जानवळे ओझरवाडी येथे नवीन साकवासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, सचिव जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना देण्यात आल्या आहेत.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील ओझरवाडी येथे साकव बांधण्यात आला आहे. या साकवाचा फायदा गावातील पुढील वाडीतील ग्रामस्थांना होणार आहे का, याची चौकशी करण्यात यावी. तसेच साकवापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची किंवा पायवाटेची कुठेही शासकीय दप्तरी २३ नंबरला नोंद नाही. जानवळे ग्रामपंचायतीने कुठल्याही मागणीचे पत्र किंवा प्रस्ताव पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर केलेले नाही; परंतु या साकवापलीकडे लोकवस्ती आहे. तेथील पुढील रस्ता बंद आहे तरी यांची आपल्या कार्यालयकडून योग्य ती चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुख्य रस्ता जानवळे हेमंत हॉटेल ते साईबाबा मंदिर मार्ग शेजारी ओझरवाडी येथे जाण्या-येण्यासाठी व वाहतुकीसाठी साकव पलीकडून कुठपर्यंत जाणार आहे, या साकवाचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होणार आहे का, असे प्रश्नही या निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत.
महसूल विभागामार्फत जो गट नंबर २४८ बिनशेती करण्यात येतो, त्याच्या जागेमधून वाट देणे बंधनकारक असते तरी हे लाभार्थी इतर लोकांना जागा देत नाहीत. नवीन शासन निर्णयाप्रमाणे पुढील घरासाठी किंवा वाडीतील लोकांसाठी जागा देणे बंधनकारक असताना पण त्यांना पायवाट/जागा दिली जात नाही, या बाबीकडे विनोद जानवळकर यांनी लक्ष वेधले आहे.
या विषयांची चौकशी करावी आणि आपला लेखी अभिप्राय कळवावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



