लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना

रत्नागिरी : जिल्हा पुरस्कार योजनेसाठी पात्र उद्योग घटकाने विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रासह ३० नोव्हेंबरपूर्वी जिल्हा उद्योग केंद्र, औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) इमारत, जे. के फाईल्स, बँक ऑफ इंडियाच्या शेजारी) या कार्यालयास सादर करावे. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक केंद्र अ. अ. आजगेकर यांनी केले आहे.
जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत लघु उद्योग घटकामध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणाच्या दृष्टीकोनातून तसेच उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व लघु उद्योजकांना उत्तेजन देण्यासाठी उद्योगांना प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पुरस्कार देण्याची योजना शासनस्तरावर राबविण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना संबंधित जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येते. या योजनेत सहभागी होण्यासाठी लघु उद्योजकांकडे उद्योगांचे नोंदणी प्रमाणपत्र/उद्यम प्रमाणपत्र असावे.
मागील तीन वर्षांत सलग उत्पादन व किमान निव्वळ नफा करत असणारे घटक या पुरस्कारास पात्र ठरतील. याकामी विहित नमुन्यात पात्र घटकाकडून मागील तीन वर्षांची वर्षानिहाय माहिती अपेक्षित राहील. उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. यापूर्वी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय किवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा. पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षात दोन पात्र उद्योग घटकांना देण्यात येतात.
पुरस्काराचे स्वरूप प्रथम पुरस्कार १५ हजार रुपये रोख, गौरव चिन्ह व शाल श्रीफळ द्वितीय पुरस्कार १० हजार रुपये रोख, गौरव चिन्ह व शाल, श्रीफळ असे आहे.



