जिल्हा नियोजनचे काम जिल्ह्याच्या विकासासाठी हानिकारक : माजी आमदार विनय नातू

आबलोली (संदेश कदम) : दोन मतदारसंघात १५ कोटी रुपये खर्च आणि तीन मतदारसंघात ८ कोटी रुपये खर्च इतकी मोठी तफावत जिल्हा नियोजनमध्ये राहिली, तर या सर्वांचा परिणाम ग्रामीण भागातील विकास कामांवर होतो. या पद्धतीने कंत्राटदारांच्या भल्यासाठी निर्णय घेतले जातात आणि कृषी विभागातील निधी कमी केला जातो. ‘जलकुंड’ या योजनेचा निधी कमी करण्यात आला आहे. अशा पध्दतीने जिल्हा नियोजनाचे कामकाज सुरू राहिले तर ते रत्नागिरी जिल्ह्याच्या एकूणच विकासासाठी हानीकारक आहे, असे स्पष्ट मत माजी आमदार विनय नातू यांनी व्यक्त केले.
जिल्हा नियोजन समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ग्रामीण रस्ते विकास या कार्यक्रमाकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये सुद्धा फार मोठी तफावत लक्षात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.



