मुख्य बातमी
रत्नागिरी शहरातील विश्वनगर येथे बिबट्याचा बैलावर हल्ला
नागरिकांनी सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी : आज (१९ डिसेंबर) रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नगरपालिका वसाहत विश्वनगर येथे अमोल सावंत यांच्या आंब्याच्या बागेत एका बिबट्याने बैलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
शहरातील नरहर वसाहत येथे काल (१८ डिसेंबर) बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. त्यात आज पुन्हा शहरातील विश्वनगर वसाहत येथील आंबा बागेत बिबट्याने बैलावर हल्ला केल्याच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. थिबा पॅलेस, विश्वनगर, आंबेशेत परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आणि मॉर्निंग वॉकसाठी एकटे दुकटे जाऊ नये, असे आवाहन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात येत आहे.



