दापोली-दाभोळ रस्त्यावरील साईड पट्टीवर खड्ड्यांमुळे अपघात
येत्या दोन दिवसांत पोलीस सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष न दिल्यास आंदोलन

दापोली : दापोली-दाभोळ रस्त्यावरील साईड पट्टीवर खासगी कंपनीकडून मोठमोठे खड्डे मारून ठेवण्यात आले असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात दापोली सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सूचित करूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन दिवसांत याची दखल घेतली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयामध्ये उपोषणाला बसू, असा इशारा स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे. याबाबत बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
दापोली-दाभोळ रस्त्यावर एअरटेल या खासगी कंपनीचे काम गेले तीन महिने सुरू आहे. हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असून, रस्त्याच्या साईड पट्टीवर मोठमोठे खड्डे मारून ठेवले आहेत. सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत आणि अपरात्री सुद्धा ते काम चालू असते. साईडपट्टीला खड्डे मारत आहेत ते काम झाल्यानंतर व्यवस्थित पाणी मारून आणि त्यावरती रोडरोलर फिरवून रस्ता खचणार नाही अशी सुव्यवस्था त्यांना तिथे करून ठेवायची आहे; मात्र असे काही करताना दिसत नाही. याआधी जिओ कंपनीच्या कामामुळे रस्ते खचले आहेत. अनेकदा अपघात झाले असून त्यातील माणसांना दुखापत झाली आहे.
असे असून सुद्धा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गेले तीन महिने दापोली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. दामले यांच्याकडे तक्रार दिली आहे. तरी ते या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करत आहेत. यापुढे इथे काही अपघात झाला तर त्याची सर्वस्व जबाबदारी या संबंधित अधिकाऱ्यांची असेल. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे याचा जनतेला प्रश्न पडला आहे. याबाबत स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सुद्धा दिले आहे.
हे निवेदन देतेवेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अजय कोळंबेकर, यतिन पेडणेकर, राजेंद्र बटावळे उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन दिवसांत याची दखल घेतली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयामध्ये उपोषणाला बसू, असा इशारा स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिश निंबकर यांनी दिला आहे.



