मुख्य बातमी

जल व्यवस्थापन ही जन चळवळ म्हणून ३६५ दिवस राबवा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६ चा समारोप

रत्नागिरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन हे केवळ कृती पंधरवडा पुरते मर्यादित राहू नये. जनचळवळ म्हणून ३६५ दिवस राबवा. यातून पाणी टंचाईवर विचार करुन योग्य नियोजन व्हायला हवे, असे मार्गदर्शन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ रत्नागिरी पाटबंधारे मंडळ यांच्यामार्फत जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा समारोप पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या उपस्थित १ मे रोजी झाला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार बोरकर, रत्नागिरी पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन महाडिक, शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अतिशय प्रामाणिकपणे जिल्ह्यामध्ये हा पंधरवडा राबवला आहे. त्याबद्दल मनापासून कौतुक करतो. राज्यामध्ये तीनशे कोटी झाडं लावायची आहेत. जलसंपदा विभागाने यामध्ये वनविभागाबरोबर पुढाकार घ्यावा. ती जगली पाहिजेत. त्याच्यासाठी उपाय योजना देखील आपण सगळ्यांनी मिळून करण्याची गरज आहे. जल व्यवस्थापनाची जन चळवळ सुरू करावी. सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ साफ करण्याचा निर्णय डीपीसीमधून घेतला. नाम फाउंडेशनमार्फत दहा ते पंधरा काम सुरू आहेत. त्यामुळे चिपळूण सारख्या शहरात गेल्या दोन तीन वर्षात पाणी आलेले नाही. गावांची पाण्याची पातळी वाढण्यासही मदत झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही योजना राज्यात आणली होती. या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या अनेक गावांची पाण्याची पातळी वाढली. सध्याच्या तापमानाचा आकडा बघितला, जलसाठ्यांचे बाष्पीभवन टाळायचं असेल तर फ्लोटिंग सौर प्रकल्प बसविण्याबाबत विचार करायला हवा. असा प्रयोग शीळ धरणावर पथदर्शी प्रकल्प म्हणून करू.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र पावन झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालाय. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र ! छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरीचे धरण बांधून जलसंपदा विभागाला प्रेरणा दिली आहे. आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान नसताना, छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने आणि संकल्पनेने या धरणाची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, देशपातळवरील राजे होते. ज्यावेळी मी तंजावरला गेलो, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय आणि कशा पद्धतीने केले, याची जाणीव मला झाली. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून एक प्रकारे मंत्रालयाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 व्या शतकामध्ये केली होती. समुद्रामध्ये किल्ला बांधून त्यावर गोड्या पाण्याचा तलाव असावा, ही संकल्पना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. खऱ्या अर्थाने जलसंपदा विभाग 16 व्या शतकात उदयाला आणला. याचा अभ्यास आपण करायला हवा.

पिण्याच्या पाण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पाणी टंचाईवर विचार केला पाहिजे. पाणी टंचाईवर या जिल्ह्याला मात करावीच लागेल. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पंधरवड्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर विभागाच्या अधिकाऱ्यांना टॅब आणि आधारकेंद्र चालकांना आधार संचाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सर विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन दीपप्रज्ज्वलाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुर्वे यांनी केले. कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी पंधरवड्यातील उपक्रमांची माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!