मुख्य बातमी

रत्नागिरीमध्ये ‘मनशक्ती’ केंद्राचा ‘यश आणि शांतीसाठी न्यू वे’ भव्य उपक्रम

२१, २२ जानेवारी रोजी स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजन

रत्नागिरी : मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा या सामाजिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मनशक्ती प्रयोगकेंद्राने ‘यश-शांतीसाठी न्यू वे’ हा उपक्रम २१ आणि २२ जानेवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित केला आहे. हा उपक्रम विनामूल्य असून कुटुंबातील सर्व वयोगटांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्राचा त्यामध्ये समावेश राहणार असल्याचे मनशक्ती केंद्राचे जीवनदानी साधक मयूर चंदने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी मनशक्ती केंद्र लोणावळ्याचे जीवनदानी साधक सुहास गुधाटे रत्नागिरी स्थानिक केंद्राचे ज्येष्ठ साधक राजांना नाईक, डॉ. विवेक इनामदार विलास सनगरे, सतीश पालकर उपस्थित होते.

उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना श्री. चंदने म्हणाले, विद्यार्थी असोत की युवावर्ग असो, सगळ्यांनाच आयुष्यामध्ये यश हवे असते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात; परंतु त्यामध्ये दोन प्रकारचे अडथळे येतात. पहिला अडथळा म्हणजे यशासाठी प्रयत्न करता करता त्याचाच ताण येतो. दुसरा अडथळा म्हणजे यश मिळाले नाही तर निराशा भेडसावते. मनशक्ती केंद्र, लोणावळा यांच्यातर्फे ताणमुक्त अभ्यासयशासाठी प्रयत्न कसे करावे याचे मार्गदर्शन केले जाते.

अभ्यासाचा ताण, पालकांच्या अपेक्षा तसेच स्पर्धा यांचा ताण असह्य झाला, तर मुले अथवा तरुण आत्महत्येलाही प्रवृत्त होण्याची शक्यता असते. अशा समस्यांवर विज्ञानशुद्ध उपाय सुचवणारे उपक्रम रत्नागिरी येथे आयोजित होत आहेत. सध्या परीक्षांचा काळ आहे. येणाऱ्या परीक्षेला ताणमुक्त मनाने कसे सामारे जायचे यासाठी खास विद्यार्थ्यांसाठी ‘अभ्यासाच्या सोप्या युक्त्या’ या विषयावरील मार्गदर्शन २१ जानेवारी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या वेळात आयोजित केले आहे. युवकांसाठी ‘दिशा ध्येय पूर्तीची’ हा उपक्रम २२ रोजी सकाळी ८.३० ते १० या काळात होईल.

आपले मूल जन्माला येताना सुदृढ आणि सुसंस्कारी जन्माला यावे यासाठी मनशक्ती केंद्रात १९६१ सालापासून जन्मपूर्व संस्कार या विषयावर मार्गदर्शन केले जाते. आंतरराष्ट्रीय परिषदांत या विषयावर मनशक्तीने शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. या शिवाय गर्भसंस्कारावर लोणावळे येथे दोन आंतरराष्ट्रीय परिषदाही आयोजित केल्या आहेत. २१ रोजी दुपारी १० ते १२ या वेळात गर्भवती भगिनी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांसाठी ‘गर्भसंस्कार’ या विषयावर मार्गदर्शन केले जाईल. सकाळी १२.३० ते दुपारी २ या वेळात कुटुंबातील ताण कमी व्हावे, सुख आणि शांती वाढावी यासाठी ‘मनशांती, ताणमुक्ती आणि ध्यान’ या विषयावरील सत्र होईल. २१ आणि २२ जानेवारीला १ ते ७ या वयोगटातील पालकांसाठी किंवा या वयोगटासाठी काम करणारे बालवाडी शिक्षक, अंगणवाडी सेविका व अन्य लोकांसाठी सकाळी ‘मुलांना घडवताना’ या विषयावर मार्गदर्शन सत्र होईल. २१ रोजी हे सत्र दुपारी २.३० ते ४ या वेळात, तर २२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळात होईल.

८ ते २१ वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी मुलांचा सर्वांगीण विकास, मोबाइल आणि त्यातील गेम्सपासून मुलांना दूर कसे ठेवावे, मुला-मुलींचा हट्टीपणा व चंचलता कशी कमी करावी इ. बाबत ‘पालकत्वाची दिशा’ या महत्त्वपूर्ण विषयावर २१ आणि २२ या दोन्ही दिवशी सायंकाळी ४.३० ते ६ या वेळात सत्र होईल.

माणसाचे जीवन सुखी आणि समाधानी होण्यासाठी त्याचे आरोग्य महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. प्रत्येकाला आपण निरोगी राहावेसे वाटत असते. त्यासाठी ते वेगवेगळ्या उपाययोजना शारीरिक पातळीवर करत असतात. परंतु पूर्णत: निरोगी रहाण्यासाठी तेवढे पूरेसे आहे का? आपले आरोग्य सुदृढ रहाण्यासाठी मनाचा यात कसा सहभाग आहे? या विषयावर २२ रोजी दुपारी १२.३० ते २ या काळात ‘आरोग्यपूर्ण जीवनाचा मार्ग’ या विषयावर मार्गदर्शनपर सत्र होईल.

पालकांप्रमाणे समाजातील शिक्षक हा एक महत्त्वाचा घटक आहे. मुला-मुलींच्या जडण घडणीत शिक्षकांचा महत्त्वाचा सहभाग असतो. यासाठी मुळात शिक्षकालाच स्वत:ला घडवावे लागते. नव्या पिढी प्रमाणे स्वत:त बदल करून प्रत्येक पिढीच्या आव्हानांना, समाजामध्ये बदलेलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊन विद्यार्थ्यांना घडवावे लागते. यासाठी ‘शिक्षक सक्षमीकरण’ या विषयावर २२ रोजी २.३० ते ४ या काळात विशेष सत्र होईल.

प्रत्येक माणसाला ताणमुक्त यशाबरोबर शापमुक्त वैभव हवे असते. पण ते मिळू शकते का? प्रत्येक कर्तबगार माणसाचा मत्सर अनेक लोक करत असतात. या मत्त्सराचा परिणाम होतो का? तो कसा होतो? त्याने त्या कर्तबगार व्यक्तीला त्रास कसा होतो? यावर काही उपाय आहेत का? इ. मुद्यांवर ‘मत्सरघात परिणाम व उपाय’ हे सत्र २१ रोजी सायंकाळी ६.३० ते ८ या वेळात होईल.

सध्याच्या शालेय जीवनामध्ये प्रामुख्याने डाव्या मेंदूच्या विकासाला प्रोत्साहन मिळते. तथापि, मुलांच्या भावी आयुष्यात उजव्या मेंदूचे स्थानही महत्त्वाचे असते, असे लक्षात आले आहे. त्या दृष्टीनेच रत्नागिरी येथील या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी खास ‘माइंड जिम’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मनशक्ती’च्या ‘माइंड जिम’ या वैशिष्ट्यपूर्ण दालनामध्ये उजव्या-डाव्या मेंदूच्या समतोल विकासासाठी प्रत्यक्ष भाग घेता येणारे मनोरंजक खेळ, ॲक्टिव्हिटीज, प्रयोग, मानस चाचण्या असणार आहेत. यामध्ये भाग घेण्याऱ्या मुलांना अतिशय अभिनव आणि आकर्षक गेम्स अनुभवता येतील. मनाची एकाग्रता, स्थिरता, सृजनशीलता वाढविणारे गेम्स हे यातील महत्त्वाचे आकर्षण असणार आहे. त्यासाठी सकाळी ९ ते ७ पर्यंत विविध सत्रे आयोजित केलेली आहेत.

या उपक्रमाचे उद्‌घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच नगराध्यक्ष अध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते २१ रोजी सकाळी १० ते १०.३० या काळात होईल.

समाजामध्ये विविध पातळ्यांवर सेवाभावाने कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि त्यांनी चालविलेल्या संस्था आहेत. मनशक्ती केंद्रातर्फे रत्नागिरीमधील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रम, पावस आणि आशादीप मतिमंद मुलांचा पालक संघ या संस्थांचा सन्मान होणार आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता होईल. प्रत्येकी ५० हजार देणगी त्यांना प्रदान करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!