रत्नागिरीतील हॉटेल, मिठाई व अन्न व्यावसायिकांसाठी गुरुवारी मोफत ‘अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणिकरण’

रत्नागिरी : अन्न सुरक्षा आणि मानदे प्राधिकरण (FSSAI) नवी दिल्ली यांच्या ‘ईट राईट इंडिया’ उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांसाठी मोफत FOSTAC (Food Safety Training and Certification) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण उद्या (२६ मार्च) होणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी तृप्ती घरत यांनी दिली.
अन्न पदार्थांचे सुरक्षित उत्पादन आणि हाताळणी व्हावी, या उद्देशाने हे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रशिक्षणा २६ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे होणार आहे. यात प्रशिक्षक अंकुश जोगदंडे (पुणे अनुष्का लॅब – केंद्र शासनाचे मान्यताप्राप्त थर्ड पार्टी ऑडिटर) मार्गदर्शन करतील.
रत्नागिरी शहर आणि परिसरातील सर्व प्रकारचे हॉटेल चालक, किराणा दुकानदार, मिठाई विक्रेते, अन्न उत्पादक आणि स्ट्रीट फूड विक्रेते यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणासाठी व्यावसायिकांनी पूर्ण नाव, आधार, मोबाईल व ई मेल यांची माहिती देवून नोंदणी करणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना केंद्र शासनामार्फत प्रमाणपत्र दिले जाईल.
अधिक माहितीसाठी व्यावसायिक www.eatrightindia.gov.in किंवा www.fostac.fssai.gov.in या संकेतस्थळांना भेट देऊ शकतात. सर्व अन्न व्यावसायिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायातील अन्न सुरक्षा दर्जा सुधारण्यासाठी या प्रशिक्षणास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती घरत यांनी केले आहे.


