शिमगोत्सवासाठी समुद्रामार्गे कोकणात ७ तासांत जाता येणार
मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी १ मार्चपासून सुरू होणार

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी जलमार्गाचा एक नवा आणि आरामदायी पर्याय उपलब्ध झाला आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान चालणाऱ्या रो-रो फेरी सेवेला १ मार्चपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे, या सेवेच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून या सुविधेचे उद्घाटन करणार आहेत.
१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई बंदरातून पहिली बोट विजयदुर्गसाठी रवाना होईल आणि दुपारी ३ वाजता तिथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटणारी बोट सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल. मार्च महिन्यात या मार्गावर बोटीच्या एकूण १६ फेऱ्या नियोजित आहेत. मुंबई ते विजयदुर्ग या मार्गावर ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च रोजी बोटी धावतील, तर विजयदुर्ग ते मुंबई या मार्गावर ५, ८, १२, १५, १९, २२ आणि २६ मार्च रोजी बोट उपलब्ध असेल.
प्रस्तुत वेळापत्रकानुसार, ‘एम2एम प्रिन्सेस’ ही फेरी मुंबईहून सकाळी ८ वाजता सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्गला पोहोचेल. परतीचा प्रवास विजयदुर्गहून दुपारी १२ वाजता सुरू होऊन सायंकाळी ७ वाजता मुंबईत संपेल. हा प्रवास साधारण ७ तासांचा असणार आहे. रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत जलमार्ग हा अधिक वेगवान आणि सुखकर पर्याय ठरणार आहे. यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल आणि स्थानिक व्यापारालाही नवी उभारी मिळेल. तसेच, लांब पल्ल्याच्या बस किंवा खासगी वाहनांच्या प्रवासाला हा एक उत्तम पर्याय प्रवाशांसमोर उपलब्ध झाला आहे. सर्व प्रवाशांनी बोट सुटण्याच्या वेळेच्या किमान ९० मिनिटे आधी बंदरावर पोहोचणे बंधनकारक आहे. ही सेवा हवामान स्थिती, बंदराची परिस्थिती आणि तांत्रिक मंजुरीवर अवलंबून
असेल.

