मुख्य बातमी

स्वगणना १०० टक्के पूर्ण करणारे ‘दळवटणे’ रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव

रत्नागिरी : भारताच्या जनगणना २०२७ या महामोहिमेचा श्रीगणेशा झाला असून, मौजे दळवटणे (ता. चिपळूण) गावाने या मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. स्वगणना प्रक्रिया १०० टक्के पूर्ण करणारे हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणनेची पूर्वतयारी म्हणून १ ते १५ मे २०२६ हा काळ ‘स्वगणना’ करण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यातील मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी स्वगणना करुन जिल्ह्यात या मोहिमेचा १ मे ला प्रारंभ केला होता. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमासाठी दळवटणे गावाची निवड करण्यात आली होती. गावाने या विहित मुदतीत आपल्या सर्व ९ वाड्यांमधील ४२५ कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या १८७१ इतकी होती. मात्र, ताज्या स्वगणनेच्या आकडेवारीनुसार गावची अंदाजे लोकसंख्या आता २२६२ झाली असून एकूण कुटुंबांची संख्या ४२५ आहे. हे यश संपादन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री. लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे आणि खेडर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव, प्रिया मोरे, मदतनीस शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले, मेघना नलावडे, सुप्रिया बोबले, अर्चना जाधव, सीमा गमरे, सुवर्णा जाधव आणि पोलीस पाटील अमित मोहिते यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.

वाड्यांनिहाय स्वगणनेचा तपशील : शेट्येवाडी १८, गणेशवाडी ५१, बागवाडी ६७, रामवाडी १८, भुवडवाडी ६४, नलावडेवाडी १०१, बडदेवाडी ३५, राजवाडा २२, बौद्धवाडी ४९, एकूण ४२५ सर्व १००% पूर्ण

दळवटणे गावाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे जिल्हा प्रशासनाकडून गावचे कौतुक होत असून, आगामी जनगणनेसाठी हे गाव आदर्श ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!