वृक्षारोपण व रॅलीने भारत संचार निगम लिमिटेडचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन
"बीएसएनएल"च्या सुविधांचा वापर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त खारेघाट रोडवरील कार्यालय व जेलरोड एक्सचेंज येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरातून बीएसएनएल रॅली काढण्यात आली. जिल्ह्यात नवीन १८८ मोबाईल टॉवर्सच्या उभारणीचे काम चालू आहे याअंतर्गत बीएसएनएलची आत्तापर्यंतची प्रगती व देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती देण्यात आली.
२७ सप्टेंबर रोजी बीएसएनएलच्या 4G सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला सत्यात उतरविण्याच्या दृष्टिकोनातून “बीएसएनएल”ने आपल्या स्वदेशी 4G मोबाईल तंत्रज्ञानाची उभारणी केली आहे. बीएसएनएलने भारतामध्ये ९७ हजार ६०० मोबाईल टॉवर्स या स्वदेशी तंत्रज्ञानाने कार्यान्वित केलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात नवीन १८८ मोबाईल टॉवर्सच्या उभारणीचे काम चालू आहे. त्याचबरोबर भारत हा टेलिकॉम क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनणारा जगातील पाचवा देश बनला आहे. हे नवीन 4G तंत्रज्ञान भारतातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना संवाद व इंटरनेट सेवा या दोन्हीचा वापर करण्यासाठी फारच उपयुक्त ठरणार आहे. या सुविधांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन “बीएसएनएल”तर्फे करण्यात आले आहे.

“बीएसएनएल”च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपमहाप्रबंधक (प्रचालन) अमृता तेले यांनी सर्व उपस्थित ग्राहकांचे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून “बीएसएनएल”च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले. त्यानंतर खारेघाट रोडवरील कार्यालय व जेल रोड एक्सचेंज येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रत्नागिरी शहरात बीएसएनएल रॅलीचे आयोजन केले गेले. यामध्ये बीएसएनएलचे अधिकारी कंत्राटदार व व्यावसायिक भागीदार देखील सहभागी झाले होते.

यानंतर बीएसएनएलची आत्तापर्यंतची प्रगती व देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती सर्व उपस्थित त्यांना देण्यात आली. २५व्या वर्धापन दिनानिमित्त खारेघाट रोडवरील कार्यालय व जेल रोड एक्सचेंज येथे विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामध्ये सहाय्यक महाप्रबंधक (प्रचालन) अरुण चवळी आणि सचिन कांबळे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, सर्व युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन सहाय्यक महाप्रबंधक (प्रचालन) श्री. कांबळे यांनी केले.



