
रत्नागिरी : नववर्ष अखेरीस कोकणात दाखल झालेले लाखो पर्यटक किनाऱ्यांवर फिरत आहेत. रत्नागिरी शहरातील सुप्रसिद्ध व गेट वे ऑफ रत्नागिरी असलेल्या मांडवी किनाऱ्यावर अस्वच्छता असल्याबाबत नगरसेवक बंटी कीर यांनी लगेचच ॲक्शन घेतली. सकाळी चर्चा झाली आणि लागलीच स्वच्छता अभियानाला सुरवात झाली. नगरसेवक बंटी कीर ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून आले.

मांडवी किनारा आणि संपूर्ण परिसराची साफसफाई, पर्यटन वाढ, ट्राफिक व्यवस्थापन आणि व्यवसायिक शिस्त या सगळ्या मुद्द्यांवर खूप स्पष्ट आणि सकारात्मक भूमिका मांडली. या वेळी श्री देव भैरी देवस्थान मांडवीचे विश्वस्त, माजी नगरसेवक नितीन तळेकर, बंड्या सुर्वे, प्रसाद सुर्वे आणि हॉटेल व्यावसायिक सुहास ठाकुरदेसाई आदी उपस्थित होते.
याबाबत सुहास ठाकुरदेसाई यांनी सांगितले की, प्रशासनाची इच्छाशक्ती आहे, आणि व्यावसायिकांची साथ मिळाली तर आपण सगळे मिळून मांडवी किनाऱ्याला एक वेगळं, आदर्श आणि अनुकरणीय बिझनेस मॉडेल नक्कीच उभं करू शकतो. हा किनारा केवळ व्यवसायाचा नाही, तो रत्नागिरीची ओळख, पर्यटनाची शान आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचा वारसा आहे. आजचा विश्वास, आजची ऊर्जा आणि आजची एकजूट उद्या मांडवीला नवीन उंचीवर घेऊन जाईल.



