भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभर निबंध स्पर्धा

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यभर निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास चालना मिळणार असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्र. सहाय्यक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.
या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, “महिलांविषयी डॉ. आंबेडकर यांचे कार्य आणि महिला सक्षमीकरणातील योगदान” या विषयावर निबंध सादर करावयाचा आहे.
स्पर्धेसाठी दोन गट निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या गटात शासकीय व खासगी आयटीआय तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा आहे. दुसरा खुला गट असून राज्यातील सर्व महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. या गटासाठी ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. निबंध केवळ मराठी भाषेत सादर करणे आवश्यक असून हस्तलिखित किंवा टंकलिखित निबंध पीडीएफ स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचा कालावधी १४ एप्रिल ते २५ एप्रिल असा आहे.
प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांकाला ३१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला २१ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ११ हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी 9152230193 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा ऑनलाईन नोंदणी करावी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.



