जिल्ह्यात १२ मे पर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २८ एप्रिल रोजी ००.०१ वाजल्यापासून ते १२ मे रोजी २४ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे.
जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनातर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच विषया संदर्भात पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० एप्रिल रोजी श्री नृसिंह जयंती, १ मे रोजी भगवान बुध्द पोर्णिमा, महाराष्ट्र दिन, कामगार दिन, ५ मे रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ग्रामपंचायत पोट निवडणुकीची आचारसंहिता संबंधित निर्वाचन क्षेत्रात लागू करण्यात आलेली असून ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान व २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.
प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.


