जिल्ह्यात २०२७ च्या जनगणनेचे नियोजन पूर्ण
नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन

रत्नागिरी : “जनगणना हा देशाच्या आणि जिल्ह्याच्या भविष्यातील नियोजनाचा पाया आहे. या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती देऊन जिल्ह्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
जिल्ह्यात जनगणना २०२७ करिता प्रशासनाकडून अत्यंत नियोजनबद्ध तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यावर्षीची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने ‘एचएलओ’ मोबाईल ॲपद्वारे होणार असून, यासाठी जिल्ह्यात सुमारे ३ हजार ८५ प्रगणक व पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ७९१ प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असून, डिजिटल प्रणाली हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
जनगणनेचे काम प्रामुख्याने दोन टप्प्यांत विभागले गेले आहे. पहिल्या टप्प्यात ‘घर यादी’ (हाऊस लिस्टिंग) तयार केली जाणार आहे. यामध्ये १ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना ‘स्व-गणना’ (सेल्फ इन्युमरेशन) करण्याची संधी उपलब्ध असेल. त्यानंतर १६ मे ते १४ जून या काळात प्रगणक प्रत्यक्ष घराघरात जाऊन घरयादी आणि घरगणनेचे काम पूर्ण करतील.
डिजिटल जनगणनेसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘एचएलओ’ मोबाईल ॲप’मध्ये एकूण ३३ प्रश्नांचा समावेश असेल. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची संपूर्ण, अचूक आणि प्रामाणिक माहिती देणे बंधनकारक आहे. डिजिटल पद्धतीमुळे माहितीचे संकलन वेगवान होणार असून ती अधिक सुरक्षित आणि पारदर्शक राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.



