मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अवकाळी वादळी पावसाचा तडाखा; ओगलेवाडीत घरावरील पत्रे उडाले

राजापूर : तालुक्यात काल अचानक झालेल्या अवकाळी वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी किरकोळ नुकसान झाले असून, शहरातील ओगलेवाडी परिसरात दाभाडे यांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे.

संध्याकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले. त्यानंतर विजांचा कडकडाट आणि प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या वादळी वाऱ्याचा फटका ओगलेवाडी येथील दाभाडे कुटुंबीयांना बसला. त्यांच्या घरावरील लोखंडी पत्रे उडून गेल्याने घराचे नुकसान झाले असून, काही घरगुती साहित्यही भिजल्याची माहिती मिळाली आहे.

घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या तसेच वीजपुरवठाही काही काळ खंडित झाल्याच्या घटना घडल्या.

अवकाळी पावसामुळे आंबा व काजू बागांनाही फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या वादळी हवामानामुळे नुकसान सहन करावे लागले.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना वादळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खराब हवामान सुरू असताना सुरक्षित ठिकाणी थांबावे, तसेच जुन्या व धोकादायक बांधकामांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!