दहावी, बारावी पुरवणी परीक्षा २४ जूनपासून

रत्नागिरी : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी लेखी पुरवणी परीक्षा २४ जून ते १६ जुलै आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र १० वी लेखी पुरवणी परीक्षा २४ जून ते ८ जुलै होणार आहे. परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बैठकीला शिक्षणाधिकारी प्राथमिक बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, प्र. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, पोलीस उपअधिक्षक राधिका फडके उपस्थित होते.
श्रीमती शिरभाते यांनी यावेळी माहिती दिली. फेब्रुवारी, मार्च मध्ये झालेल्या दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील १८ हजार ११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १७ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ९८.५८ इतकी टक्केवारी आहे. तर फेब्रुवारी, मार्च मध्ये बारावीच्या १५ हजार २९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १४ हजार ६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९५.६७ इतकी आहे.
२४ जूनपासून होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी ६७ माध्यमिक शाळांमधील जिल्ह्यातील १४० विद्यार्थी ४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. तर ६३ कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी ३३३ विद्यार्थी ३ परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत.



