रत्नागिरीत ८ ऑगस्टपासून मुलांसाठी विनामूल्य श्री सत्यसाई बालविकास वर्ग

रत्नागिरी : आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात लहान मुलांवर योग्य संस्कार होणे आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हीच गरज ओळखून श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी यांच्या वतीने शहरातील चिमुरड्यांसाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ८ ऑगस्टपासून नाचणे रोड परिसरात ५ ते ७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘श्री सत्यसाई बालविकास वर्गाचा’ शानदार शुभारंभ होत आहे. हा वर्ग पूर्णपणे विनामूल्य असून, आठवड्यातून केवळ एकदाच घेतला जाणार आहे.
या बालविकास वर्गाचे मुख्य उद्दिष्ट मुलांचा बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक विकास साधणे हे आहे. आजकाल मोबाईल आणि टीव्हीच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांमधील मैदानी खेळ आणि संवाद कमी होत चालला आहे. अशा काळात मुलांमध्ये नैतिक मूल्ये, आदर, आणि सांघिक भावना (Team Spirit) निर्माण करण्यासाठी या वर्गाची रचना करण्यात आली आहे. या वर्गात केवळ पुस्तकी ज्ञान न देता विविध रंजक आणि अभ्यासपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मुलांवर संस्कार केले जातील. यामध्ये थोर पुरुषांचे विचार आणि नीतिमूल्यांवर आधारित गोष्टी सांगून मुलांचे चरित्र घडवणे, मुलांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी भजनांचे शिक्षण, मुलांचा स्टेज धीटपणा आणि सुरांचा सराव वाढवण्यासाठी एकत्रित गायन, प्राचीन भारतीय संस्कृतीतील श्लोकांचे शुद्ध उच्चारांसह पठण आणि मानसिक शांततेसाठी ध्यान पद्धती, मुलांच्या कल्पकतेला आणि आत्मविश्वासाला वाव देणारे विविध बौद्धिक खेळ या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असेल.
हा वर्ग ८ ऑगस्टपासून भूषण बेलवलकर यांच्या निवासस्थानी (‘शिवप्रसाद’, चैत्रबन, नाचणे रोड, रत्नागिरी) सुरू होत आहे. परिसरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या ५ ते ७ वर्षे वयोगटातील पाल्यांची नावे नोंदवून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सत्यसाई सेवा समितीने केले आहे. नाव नोंदणीसाठी नलिनी बोंद्रे (९१७५५०७२७५), भूषण अनंत बेलवलकर (९३७०२८५१९९) यांच्याशी संपर्क साधावा.



