आबलोलीच्या चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालयाची पद्मश्री वैद्यची सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी पद्मश्री प्रसन्ना वैद्य हिची सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार २०२५-२६ साठी निवड झाली आहे. याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. गिरी व शिक्षक वृंद यांनी तिला पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या पुरस्काराबद्दल तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पद्मश्रीला मुख्याध्यापक श्री.
गिरी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रशाला स्तरावर पद्मश्री वैद्य विविध बक्षिसे सतत मिळवत असते. त्याबरोबरच ती बुद्धिबळ उत्तम पद्धतीने खेळते. बुद्धिबळामध्ये ती अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारताना दिसते. “विविध कलागुणांनी युक्त असलेल्या पद्मश्रीचा आम्हाला अभिमान आहे व तिचे कौतुक आहे,” असे उद्गार संस्था अध्यक्ष चंद्रकांत बाईत यांनी काढले. संस्थेचे कार्याध्यक्ष सचिन बाईत व सर्व संस्थांचालक यांनी पद्मश्रीला शुभेच्छा दिल्या .
‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी शनि-रवि. दि. १३-१४ डिसेंबर रोजी ५९ कोकण शाळांतील एकूण २४५ विद्यार्थ्यांच्या सामूहिक मुलाखती पार पडल्या. या विद्यार्थ्यांमधून ३६ शाळांतील ३६ विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या मुलाखतीसाठी तज्ज्ञ परीक्षक म्हणून भगीरथ संस्थेचे संस्थापक डॉ. प्रसाद देवधर, डॉ. मिलिंद गोखले आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. वैभव कानिटकर यांनी काम पाहिले. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणाऱ्या सोहळ्यामध्ये पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.


