रत्नागिरीत जेल नाका सिग्नल बंद करण्याची ठाकरे युवासेनेची मागणी
प्रचंड उष्णतेमुळे नागरिक त्रस्त

रत्नागिरी : शहरातील जेल नाका येथील मुख्य रस्त्यावर कार्यरत असलेली सिग्नल यंत्रणा तात्पुरती बंद करण्यात यावी, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सुरेश सावंत यांनी वाहतूक पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
युवासेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या वाढलेल्या प्रचंड उकाड्यामुळे वाहनचालकांना सिग्नलवर १५ ते २० मिनिटे थांबावे लागत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच जेल नाका परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झाल्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सिग्नलमुळे वाहतूक कोंडी वाढून इंधनाचा अपव्यय होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
युवासेनेने प्रशासनाकडे सिग्नल यंत्रणा तातडीने बंद करून त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. परिस्थितीनुसार वाहतूक सुरळीत करण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख संदेश नारगुडे, कॉलेज कक्ष तालुकाप्रमुख अमन राणे उपस्थित होते.



