मुख्य बातमीराजकारण

रत्नागिरी शहरातील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा : भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे

रत्नागिरी : शहरातील मान्सूनपूर्व कामे अजूनही पूर्ण झालेली नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या शहर मंडलातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली आणि मान्सूनपूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी निवेदन देत केली.

रत्नागिरी शहरातील नालेसफाई, गटारे, वहाळ व इतर साफसफाई अजूनही झालेली दिसत नाही. पावसाळ्यामध्ये याचा फटका रत्नागिरी शहरवासीयांना बसू शकतो. ही शक्यता लक्षात घेता नालेसफाई अधिकचे मनुष्यबळ लावत लवकरात लवकर करावी. तसेच ज्या ठिकाणी पाणी साठत आहे, जी गर्दीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्यात. रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना म्हणून डास प्रतिबंधक फवारणी करावी. तसेच रत्नागिरी शहरातील विविध योजनांसाठी खोदण्यात आलेले रस्ते त्वरित बुजवून त्यावर डांबरीकरण करावे, काँक्रीट करण्यात आलेल्या रस्त्यांच्या बाजूच्या साईटपट्ट्या डांबरीकरण कराव्या. अन्यथा त्याचा फटका रत्नागिरी शहरवासीयांना अनेक ठिकाणी बसणार आहे. ही वस्तुस्थिती भाजप शिष्टमंडळाने शहर प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे.

रत्नागिरी शहरातील विविध प्रभागांमध्ये असलेल्या समस्यांवरती देखील चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये शहराध्यक्ष दादा ढेकणे, नीलेश आखाडे, शैलेंद्र बेर्डे यांनी वेगवेगळ्या प्रभागातील समस्या मांडल्या. यापूर्वी भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्या-त्या प्रभागांमध्ये असलेल्या समस्यांबाबत रत्नागिरी नगर पालिकेला माहिती दिली असून ती देखील कामे त्वरित करावी, अशी मागणी करण्यात आली.

तत्पूर्वी भाजपच्या वतीने नवनियुक्त मुख्याधिकारी श्री. गारवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह मंदार खंडकर, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, पल्लवी पाटील, सचिन गांधी, नितीन जाधव, संपदा तळेकर, शैलेंद्र बेर्डे, शंकर शिंदे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!