राज्य राखीव पोलिस बलाच्या (गट क्रमांक VIII) १९८२ बॅचचे गेट-टुगेदर अलिबागमध्ये संपन्न

अलिबाग (राजेश बाष्टे) : राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गट क्रमांक VIII मधील १९८२ साली भरती झालेल्या जवानांनी आपली प्रदिर्घ सेवा पूर्ण करून अधिकारी पदावर सेवानिवृत्त झालेले, तब्बल ४३ वर्षे सहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अलिबाग येथे एक अविस्मरणीय स्नेहसंमेलन (गेट-टुगेदर) नुकतेच साजरे केले.
या कार्यक्रमाचे नियोजन अलिबाग दर्शन टीम यांच्या सहकार्याने रुक्मिणी कुंज रिसॉर्ट, सातीर्जे, बोंबटकरपाडा, अलिबाग येथे करण्यात आले होते. शांत आणि निसर्गरम्य परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्वांनी एकमेकांना प्रेमाने मिठ्या मारून आपुलकीने भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. या कालावधीत दिवंगत झालेल्या एकूण १६ सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या स्मृतींना उपस्थितांनी शांततेत व आदराने उजाळा दिला.
या स्नेहसंमेलनास १९८२ बॅचचे विविध ठिकाणाहून सेवानिवृत्त झालेले भीमराव पवार, ज्ञानेश्वर सावंत, मनोहर पवार, सुभाष म्हामुनकर, गुणाजी पाटील, प्रल्हाद पाटील, रोहिदास भगत, प्रकाश गवस, चंद्रकांत वाघचौडे, अरुण सालावकर, शंकरराव खताळ, पोपटराव दडस, अशोकराव पाटील, दिनेश शिंदे हे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामुळे सेवेत असताना निर्माण झालेल्या आपुलकीच्या नात्यांना नवसंजीवनी मिळाली. अशा स्नेहसंमेलनांमुळे पोलिस दलातील बंधुभाव अधिक दृढ होतो, हेच या कार्यक्रमाने दाखवून दिले.



