नाहक बदनामीविरोधात ब्राह्मण समाजाचे रत्नागिरी पोलिसांना निवेदन

रत्नागिरी : गेले आठवडाभर श्री पतित पावन मंदिर संस्था व भजनी बुवांमधील वाद चिघळल्याचे दिसत आहे. या दोघांमधील कोणत्याही वादात ब्राह्मण समाजाचा संबंध नसताना हेतूपुरस्सर, जाणूनबुजून नाहक वेठीला धरले जात असून बदनामी केली जात आहे. संबंधित वादामध्ये ब्राह्मण समाजाचा दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करावी व दोषींनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी, असे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले आहे.
अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, “रत्नागिरीतील काही व्यक्ती विविध जातींमध्ये असलेला जातीय सलोखा विविध जाती-जातींमध्ये द्वेष पसरवून, समाजामध्ये वादविवाद निर्माण करून, जातीत तेढ पसरवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाज माध्यमांवर यामुळे वादंग निर्माण होत आहेत. अशा अपप्रवृत्तीला वेळीच पायबंद घालून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही गंभीर प्रश्न उद्भवू नये, म्हणून वेळीच योग्य ती समज देऊन कठोर शासन करण्यात यावे. तसेच त्यांनी ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागावी. शांतताप्रिय म्हणून नावलौकिक असलेल्या ब्राह्मण समाजाला न्याय मिळावा ही विनंती.”
अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने कार्यवाह राजन पटवर्धन, सहकार्यवाह अनंत आगाशे, रवीकांत शहाणे, सुधाकर वैद्य यांनी निवेदन दिले. जिल्हाधिकारी व शहर पोलीस निरीक्षकांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.



