‘ब्लू इकॉनॉमी’ कोकण विभागाची जीवनरेषा ठरेल
८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या शुभेच्छा : २१ ऑगस्टला 'महा वॉकेथॉन' मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्रितपणे काम करत असून, कोकण विभागाच्या विकासासाठी ‘ब्लू इकॉनॉमी’ (सागरी अर्थव्यवस्था) ही आगामी काळात जीवनरेषा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या विशेष संदेशात श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच विकसित महाराष्ट्र घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोकण विभागाला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा पाहता, ‘ब्लू इकॉनॉमी’वर लक्ष केंद्रित केले जात असून त्यासाठी प्रशासन सर्वतोपरी कार्यरत आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आजपासून ‘जलसंधारण सप्ताहा’ला सुरुवात करण्यात आली असल्याची घोषणा विभागीय आयुक्तांनी केली. तसेच, या मोहिमेचा आणि जनजागृतीचा एक भाग म्हणून येत्या २१ ऑगस्ट रोजी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून एका भव्य ‘महा वॉकेथॉन.. वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.



