घरगुती गँस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशभरात दैनंदिन वापरातील आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना रविवारी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका दिला आहे. रविवारी सकाळपासून घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार एलपीजी सिलेंडरचा भाव २९ रुपयांनी वाढला आहे. यामुळे ‘कॉमन मॅन’च्या घरातील किचन बजेट कोलमडणार आहे. ही दरवाढ १४.२ किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या तीन महिन्यांत एलपीजीच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर, आता दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. देशातील इतर भागांतही २९ रुपयांचीच वाढ झाली आहे.
घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे मुंबईतील १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर ९१२.५० रुपयांवरुन ९४१.५० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. यापूर्वी ७ मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता २९ रुपयांची दरवाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेल व दैनंदिन वापरातील अन्य वस्तूंच्या महागाईमुळे सामान्य माणूस अगोदरच मेटाकुटीला आला असताना एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडणार आहे. एलपीजी गॅसचे उत्पादन करणाऱ्या सरकारी कंपन्या अजूनही प्रत्येक घरगुती सिलेंडरमागे ७०३ रुपयांचा तोटा सहन करत आहेत. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात वाढ केली होती. १ जून रोजी कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ४२ रुपयांनी वाढला होता. गेल्या पाच महिन्यात १९ किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत. १ जानेवारीपूर्वी १९ किलोच्या सिलेंडरचा दर १५८० रुपये होता. १ जूनला तोच दर आता ३११३.५० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच १९ किलोच्या एलपीजीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात जानेवारी महिन्यात १११ रुपये, फेब्रुवारीत ४९ रुपये, मार्चमध्ये २८ रुपये, ७ मार्चला ११४.५० रुपये, एप्रिल महिन्यात १९५.५० रुपये, मे महिन्यात ९९३ रुपये आणि जून महिन्यात ४२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल आणि खाद्यपदार्थांचे दर वाढले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या चिंता वाढत आहेत. पेट्रोल-़डिझेल, गॅस व अन्नधान्याचे दर सातत्याने वाढत आहेत. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.



