टेरवच्या सुहास कदम यांना ‘ज्येष्ठ प्रशिक्षक – महिला गट’ राज्य पुरस्कार प्रदान

चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावचे सुपुत्र, चेंबूर क्रीडा केंद्र मुंबईचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते कबड्डी प्रशिक्षक सुहास दत्तात्रय कदम यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने “ज्येष्ठ प्रशिक्षक – महिला गट” या राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कबड्डी महर्षी कै. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त १५ जुलै रोजी रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित २६ व्या महाराष्ट्र राज्य कबड्डी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोक (भाई) जगताप यांच्या हस्ते तसेच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार , आमदार किरण सामंत यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सुहास कदम यांना स्व. फिदा कुरेशी यांच्या स्मरणार्थ “अमृत कलश” प्रदान करून गौरविण्यात आले.
सुहास कदम हे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या राजश्री पवार, रिबेका गवारे आणि भारतीय महिला कबड्डी संघाच्या माजी कर्णधार शिवछत्रपती व अर्जुन पुरस्कार विजेत्या अभिलाषा म्हात्रे या खेळाडूंचे गुरु म्हणूनही ओळखले जातात.
टेरव गावच्या या सुपुत्राच्या गौरवाबद्दल चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई, राधाकृष्ण साधनालय संघ टेरव मुंबई, जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई, श्री क्षेत्र टेरव मंदिर व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत टेरव तसेच विविध कबड्डी संघटना व संघानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.



