मुख्य बातमी

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे आज बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. ते कोल्हापूरहून रत्नागिरीकडे प्रवास करत असताना पाली परिसरात अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना पाली येथील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजेश सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी पक्षाची मुळे ग्रामीण भागापर्यंत मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पक्षवाढीसाठी त्यांनी अनेक संघटनात्मक उपक्रम राबवले तसेच कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून संघटन अधिक सक्षम करण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांना पक्षात काम करण्याची संधी मिळाली.

स्पष्टवक्तेपणा, अभ्यासू वृत्ती, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध ही त्यांची खास ओळख होती. कोणत्याही विषयावर ठाम भूमिका मांडण्याची त्यांची शैली कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी वाटत असे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपले होते. त्यामुळे ते केवळ पक्षाचे नेते नव्हते, तर अनेक कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक आणि विश्वासू सहकारी होते. उत्कृष्ट क्रिकेटपट्टू म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीच्या राजकीय क्षेत्रातील एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. राजेश सावंत यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा मित्रपरिवार आणि असंख्य कार्यकर्ते असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी सहज भरून न निघणारी असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!