सिकंदराबाद येथे माजी सैनिक आणि सेवारत सैनिकांच्या पाल्यांसाठी ‘अग्निवीर’ भरती मेळावा

रत्नागिरी : ‘युनिट हेडक्वार्टर कोटा’ अंतर्गत ईएमई (EME) केंद्र, बोलारम (सिकंदराबाद) येथे आगामी २९ ऑगस्ट ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ‘अग्निवीर टेक्निकल’ आणि ‘अग्निवीर/ट्रेड्समन-शेफ’ या पदांसाठी विशेष सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने युद्ध विधवा, माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांचे पाल्य, तसेच सध्या सेवेत असणाऱ्या सैनिकांचे पाल्य व भाऊ यांच्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार, या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी भरतीच्या तारखेला सकाळी ठीक ६ वाजता ईएमई केंद्र, बोलारम (सिकंदराबाद) येथे आपल्या सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायचे आहे.
या भरतीसंदर्भात उमेदवारांना काही शंका किंवा अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी ०४०-२७८६३०१६ या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा
awwaleagle@gmail.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

