मुख्य बातमी

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असा महामार्ग तयार होईल : पालकमंत्री उदय सामंत 

रत्‍नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम बहुतांशी झाले आहे. रत्‍नागिरीतून साडेचार-पाच तासात पनवेलला जाता येते. काही ठराविक ठिकाणचे टप्पे अर्धवट आहे; परंतु गणेशोत्सवात गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होईल, अशा पद्धतीचा हा मार्ग तयार होईल, असा विश्‍वास रत्‍नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी (७ ऑगस्ट) माळनाका येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर, माणगाव येथील बायपासच्‍या भूसंपादनाचे प्रश्‍न सुटले असून येथील कामेही वेगाने सुरू आहेत. महाड ते आरवलीपर्यंतची कामे पूर्ण झाली आहेत. आरवली ते लांजा अशी काही टप्‍प्‍यातील कामे रत्‍नागिरी जिल्‍ह्यात सुरू आहेत. विशेषत: लांजा ते हातखंबा काम झाले असून लांजाच्‍या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. अन्‍य कामेही गणपतीपूर्वी मार्गी लावण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत; मात्र गणपतीत गणेशभक्‍तांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला. चिपळूण उड्डाण पुलाचे कामही वेगाने सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

रत्‍नागिरी-कोल्‍हापूर मार्गातील काही ठराविक भाग शिल्‍लक आहे. सध्‍या रत्‍नागिरी ते आंबा अगदी पाऊण ते एक तासात जाता येते. मलकापूर, बांबवडे येथील बायपासची कामे सुरू आहेत. ही कामे झाल्‍यावर कोल्‍हापूर दीड ते पावणेदोन तासाच जाता येईल असेही त्‍यांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गावर कशेळी घाटात दरड कोसळल्‍याची ओरड सुरु होती. मात्र घाटात असा कोणताही प्रकार घडला नव्‍हता. घाटापासून पुढे मुख्‍य रस्‍त्‍यापासून जवळपास दोनशे मीटर अंतरावर एक डोंगर पूर्ण घसरून खाली आला. त्‍याची माती व दरड रस्‍त्‍यावर आली. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अशा भूस्खलनावर अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यास समिती नेमली जाणार आहे. त्यावर अभ्यास करून कामात सुधारणा केली जाईल, असे पालकमंत्री सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!