रत्नागिरीत ‘खेलो इंडिया’ बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रासाठी १३ ऑगस्ट रोजी खेळाडू निवड चाचणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील १० ते १४ वयोगटांतील प्रतिभावान खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. जिल्हा क्रीडा संकुलात मंजूर झालेल्या ‘जिल्हास्तर खेलो इंडिया बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रा’साठी येत्या १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या चाचणीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका खेळासाठी ‘खेलो इंडिया’ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येत असून, रत्नागिरी जिल्ह्याला बॅडमिंटन या खेळासाठी मान्यता मिळाली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळणार आहे.
ही निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी स्टेडियम, बॅडमिंटन हॉल, मारुती मंदिर (रत्नागिरी) येथे पार पडेल. या केंद्रासाठी १० ते १४ वयोगटातील एकूण ३० खेळाडूंची निवड केली जाणार असून, यामध्ये १५ मुले आणि १५ मुलींचा समावेश असेल. चाचणीसाठी येताना सर्व खेळाडूंनी स्वतःचा जन्माचा दाखला आणि आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.
खेळाडूंनी खालील लिंकवर आपली पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे:
https://docs.google.com/forms/d/e/9FAIpQLSCTL१७AYGjOCLuqBDANOWYktby2KM९W७Evy-IAgAKPVC_Fw/viewform?usp=header
या प्रशिक्षण केंद्रासाठी अंतिम निवड झालेल्या सर्व खेळाडूंना शासनातर्फे क्रीडा गणवेश आणि आवश्यक क्रीडा साहित्य मोफत दिले जाणार आहे. या केंद्रातील सराव सोमवार ते शनिवार सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत नियमितपणे सुरू राहील.
या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा क्रीडा कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश खैरमोडे (मो. नं. ९२८४३४२२१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.


