राजरत्न महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या काजू प्रक्रिया उद्योग शेडचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

राजापूर : तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच स्थानिक कृषी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राजरत्न महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड, ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांच्या वतीने मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या काजू प्रक्रिया उद्योग शेडचे भूमिपूजन आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
कोकणातील काजू उत्पादनाला मोठी बाजारपेठ असून, काजूवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन केल्यास शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटांना अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो. याच उद्देशाने राजरत्न महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून काजू प्रक्रिया उद्योग उभारण्यात येत आहे. या उद्योगामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळण्यास मदत होणार असून, महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
भूमिपूजन प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना उद्योग, व्यवसाय आणि कृषी प्रक्रिया क्षेत्रात सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ घेण्याचे आवाहन केले. काजू, आंबा, कोकम यांसारख्या कोकणातील कृषी उत्पादनांवर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून त्यांचे ब्रँडिंग व मार्केटिंग केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
या काजू प्रक्रिया उद्योगामुळे काजूचे संकलन, प्रक्रिया, वर्गीकरण, पॅकिंग आणि विक्री या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच महिला शेतकऱ्यांना उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
कोकणातील काजूला स्थानिक पातळीवरच मूल्यवर्धन करून त्याला बाजारपेठ मिळवून देणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश असून राजापूर तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योगाला या प्रकल्पामुळे निश्चितच नवी दिशा मिळणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली उभा राहत असलेला हा उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि स्थानिक महिलांसाठी रोजगारनिर्मिती करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
यावेळी तालुका प्रमुख दीपक नागले, रवींद्र नागरेकर, सभापती नंदनी कदम, सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, संबंधित सर्व अधिकारी पदाधिकारी महिला वर्ग कंपनीचे सर्व संचालक उपस्थित होते.



