ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : “ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या नेत्यांशी सुमारे दीड तास चर्चा झाली. ९ तारखेला मराठा आरक्षणाविरूद्ध या समाजाचे मुंबईत आंदोलन आहे. या पार्श्वभूमीवर आज या समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. हैद्राबाद गॅजेटीअर हे त्या भागापुरते मर्यादित आहे. त्याचा कोकणाशी काही संबंध आहे. या गॅजेटीअरमुळे ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही किंवा ते कमी होणार नाही. तसा शब्द मी तुम्हाला देतो. या अद्यादेशाबाबतची भूमिका मी त्यांच्या समोर मांडली. त्यांच्या शंकाही दूर करण्याचा प्रयत्न केला,” अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ओबीसी आणि तिलोरी कुणबी समाजाच्या प्रमुख नेत्याशी मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदे ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी उपस्थित होते. ओबीसी, कुणबी समाजाच्या शंकांचे शासनस्तरावर पूर्ण समाधान व्हावे, यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पालकमंत्री सामंत म्हणाले, “हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात जिल्ह्यात एकही दाखला सापडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३६३ कुणबी-मराठा नोंदी सापडल्या आहेत. परंतु त्यापैकी आतापर्यंत फक्त १५ दाखले मिळाले आहेत. परंतु त्यांची पुर्ण जातपडताळणी झालेली नाही. लांजा, संगमेश्वर, देवरूख, आदी भागातमध्ये या नोंदी सापडल्या आहेत.”
पूरग्रस्तांना मदतीचे तोरण बांधून दसरा साजरा करणार
विदर्भ, मराठवाड्यामध्ये महापुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या लोकांना मदतीचा हात पुढे करावा, असे विविध कंपन्यांना आवाहन केले आहे. त्यानुसार कंपन्यांचा सीएसआर फंड देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. समाजातील सर्व थरातील लोकांनी मदत करावी. दसरा मेळावा हा शिवसेनेचे परंपरा आहे; परंतु महापूरामुळे शिवसेनेने आजाद मैदानावरील दसरा मेळावा रद्द केला आहे. परंपरेनुसार गोरेगावला तो होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्या पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली असून पूरग्रस्त जिल्ह्यामध्ये जाऊन बाधितांना मदत करून त्यांच्या घराला तोरण बांधून दसरा साजरा करण्यासाठी आम्ही सर्व जाणार आहेत, असे पालकमंत्री सामंत यान सांगितले.



