रत्नागिरीत महायुती एकसंघ; विजय निश्चित : ना. उदय सामंत

चिपळूण : “महायुती ही केवळ राजकीय युती नसून विचारांची, विकासाची आणि एकसंघतेची युती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा प्रत्येक ठिकाणी फडकला पाहिजे, हा संकल्प आज सर्व पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना उपनेते तथा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दृढ केला.
रत्नागिरी जिल्हा (उत्तर) महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील अतिथी सभागृह येथे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
आपल्या तीनही पक्षांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास जिंकण्याचा आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार नव्याने ना. सामंत यांनी व्यक्त केला.
आपल्या मतभेदांपेक्षा महायुतीचे एकसंघ बळ मोठे आहे आणि हेच बळ आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणार आहे. महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या पक्षाचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा प्रतिनिधी आहे, हे विसरू नये, असे यावेळी सामंत म्हणाले.
या प्रसंगी राज्य मंत्री योगेश कदम, माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते सदानंद चव्हाण, उपनेते संजय कदम, माजी आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, प्रशांत कदम, प्रशांत यादव यांसह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



