मुख्य बातमी

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जिल्ह्याची सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती

१ हजार १९ नव उद्योजकांची प्रकरणे मंजूर

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७८० प्रकरणांचे उद्दिष्ट होते. जिल्ह्याचे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचे १३०.६४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. उद्दिष्टपूर्तीसाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उद्योग सहसंचालक कोकण विभाग विजू शिरसाट, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांचे मार्गदर्शन लाभले. एकूण प्राप्त झालेल्या २ हजार ६९२ अर्जांपैकी २ हजार २४६ नवउद्योजकांचे अर्ज पात्र ठरले. त्यापैकी १ हजार १९ नव उद्योजकांची कर्ज प्रकरणे मंजूर झाली. तसेच लाभार्थ्यांना अनुदान (सबसिडी) मिळवून देण्यात व अनुदान दावे (मार्जिन मनी क्लेम) करण्यात जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी दिली.

सार्वजनिक व खाजगी बँकानी त्यांना दिलेले उद्दीष्ट विहित वेळेत पूर्ण केल्याने चालू आर्थिक वर्षात योजनेंतर्गत जिल्ह्याची उद्दीष्टपूर्ती झालेली आहे. यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सातत्यपूर्ण बैठका घेवून हे लक्ष साध्य केले आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्व बँकाचे अभिनंदन केले असून भविष्यात देखील रत्नागिरी जिल्हा आघाडीवर ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व केंद्र शासनाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेत जिल्ह्यातील सर्व बँकाचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. या सर्व योजनांचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतीने घ्यावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे.

जिल्हयातील बँक ऑफ इंडियाने ३१७, बँक ऑफ महाराष्ट्र १४७, स्टेट बँक ऑफ इंडियाने -९४, कोटक महिंद्रा बैक ८५, महाराष्ट्र ग्रामीण बँक ६१, युनियन बँक ५३ अशी मंजूरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील इतर सर्व बँकांनी उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य केले आहे.

या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक शाखा व्यवस्थापक व जिल्हा उद्योग केंद्राच्या सर्व अधिकारी व कर्मचारी व खादी ग्रामोद्योग मंडळाचे श्री. इंदुलकर व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेच्या उमेद (एमएसआरएलएम) व माविम यांनीही जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित करून बचतगटांना या योजनेचा लाभ देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या उद्दिष्टपूर्तीमध्ये, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था मिटकॉन व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीइडी) यांनीही हातभार लावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!