“बालवीरांच्या गोष्टी”चे उद्या आकाशवाणीवर प्रसारण

रत्नागिरी : बालकांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना बालवीर पुरस्काराने सन्मानित केले जाते. अशा बालवीरांच्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत बाल जगत या कार्यक्रमात. संकटकाळात दाखवलेले शौर्य, प्रसंगावधानाने इतरांचे प्राण वाचवल्याबद्दल दरवर्षी २६ जानेवारीला बालवीर पुरस्काराने या मुलांना गौरवले जाते. याच वीरांच्या शौर्यगाथा ऐकायला मिळणार आहेत उद्या (३ मे) सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बाल जगत या कार्यक्रमात.
डॉ. मंजुषा थत्ते यांच्या सोबत स्वरा अनिल सावंत, स्वयम अनिल सावंत, संस्कार संजय गोलांबडे हे विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. मुलांना प्रेरणादायी असणारा हा कार्यक्रम 1143 Khz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसेच 101.5 Mhz या एफ. एम. वाहिनीवर आणि newsonair या लाईव्ह मोबाइल अँपवर ऐकायला मिळणार आहे. आकाशवाणी प्रसारणानंतर हा कार्यक्रम airratnagiri या यू ट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी उपलब्ध होईल.
जास्तीत जास्त श्रोत्यांनी हा कार्यक्रम अवश्य ऐकावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे निवेदन सोनाली सावंत यांनी केले असून सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.



