श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा वाहनाला अपघात; अरुंद रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर

राजापूर : तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने आज (२५ मे) पुन्हा एकदा एका वाहनाला अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे काही अंशी नुकसान झाले आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांना गणेश मंदिरासमोरील अरूंद रस्त्याचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. आजही अशाच एक भाविकाची चारचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात अडकल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
राजापूर शहराला लागूनच असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराची ख्याती संपूर्ण राज्यात पसरलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. त्यातच शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून या मंदिराचे जतन आणि सुशोभिकरण केले आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. परिणामी मागील एक-दोन वर्षांपासून भाविकांसह पर्यटकांचा ओढा देखील वाढला आहे. मात्र राजापूर शहरातून मंदिराकडे जाणारा रस्ता हा फार अरूंद व तीव्र उताराचा आहे. त्यामुळे दोन गाड्या समोरासमोर आल्या की एकमेकाला बाजू देताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
सध्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला असून सातत्याने पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र अरूंद रस्त्यामुळे मंदिरापासून जवळपास एक किलोमीटर लांब गाड्या पार्क करून भाविकांना चालत मंदिर गाठाव लागले होते. त्यामुळे श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच श्री गणेश मंदिराजवळ असणाऱ्या गटाराजवळा सातत्याने अरूंद रस्त्याचा आणि तीव्र उताराच्या रस्त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडण्याचे प्रकार घडत आहेत.
सोमवारी अशा पद्धतीने गणेश मंदिराजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने एका भाविकाची गाडी थेट गटारात कलंडली. अखेर अन्य भाविक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाडी रस्त्यावर काढण्यात आली.



