धामणसे गावात २०० नारळ रोपांचे वितरण
श्री रत्नेश्वर ग्रंथालय : तीन वर्षांत ९०० झाडांचे संवर्धन

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत ९०० झाडांची लागवड करून संवर्धन करण्यात आले आहे. ग्रंथालयाच्या आवारात लावलेल्या कदंब झाडाचा तिसरा वाढदिवस व २०० नारळ रोपांचे वाटप विद्यार्थी, ग्रामस्थांना आज करण्यात आले. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसत असताना गावातच झाडांचे जतन करण्याचा वसा घेतल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांनी दिली.
“एक झाड – एक पुस्तक” हा अभिनव उपक्रम गुरुवारी उत्साहात झाला. पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना श्री रत्नेश्वर ग्रंथालय छोटेसे योगदान देत आहे. आम्ही झाड देऊन थांबत नाही, तर झाडाचे संगोपन नीट होत आहे की नाही, याची माहिती व फोटो घेऊनच वृक्षमित्र सन्मानही देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार एक झाड आईच्या नावे ही संकल्पना घेऊन झाडांना घरातील दिवंगत व्यक्तींची नावे देण्यात येतात. आज ग्रंथालयाच्या आवारात डॉ. एन. पी. सांबरे यांच्या स्मरणार्थ नारळाचे झाड उमेश कुळकर्णी यांच्या हस्ते लावण्यात आले.
तसेच ज्यांना गेल्या वर्षी झाड दिली होती अशा ४० वृक्षमित्रांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत आहे, त्यामुळे आज झाडासोबतच विद्यार्थ्यांना एक वाचनीय पुस्तक भेट दिले आहे. याप्रसंगी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
“एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया… एक पुस्तक वाचूया, ज्ञानदीप लावूया” हा संदेश देण्यात आला. यंदा नारळाची रोपे देण्यात आली आहेत. श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला. ही रोपे लोक जगवतील का असा प्रश्न विचारला जातो, पण रत्नेश्वर ग्रंथालयाचे याकडे विशेष लक्ष असते, त्यामुळे झाडाची निगा राखण्यासंबंधी सूचना दिल्या जातात. आगामी काळात लागणारे खतपाणी व अन्य मार्गदर्शनही केले जाईल, अशी ग्वाही उमेश कुळकर्णी यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी सरपंच अमर रहाटे, उपसरपंच सौ. ऋतुजा कुळकर्णी, रत्नागिरीच्या नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय निवेंडकर, सोसायटीचे सचिव सुनील लोगडे, दीपक जाधव, ग्रंथालयाचे चिटणीस मुकुंद जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, ग्रंथपाल केशव कुळकर्णी, संचालक प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, अनंत जाधव, सौ. स्मिता कुळकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारशे, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी धनावडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ढापरे, अंगणवाडी सेविका,ओरी गावातील ग्रामस्थ शंतनू देसाई राजेंद्र डाफळे, शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



