युवकांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी १६ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका (डिप्लोमा) तसेच पदवीधर (बीई, बीटेक सह) युवकांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेत सहभागासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ ऑगस्टपर्यंत असून, जास्तीत जास्त पात्र युवकांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त द. दी. चव्हाण यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजने’चा तिसरा टप्पा आता सुरू झाला आहे. याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि बजाज जनरल इन्शुरन्स (Bajaj General Insurance) यांसारख्या विविध नामांकित आस्थापनांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या योजनेसाठी १८ ते २५ वयोगटातील भारतीय युवक पात्र आहेत. (अट: उमेदवार सध्या पूर्णवेळ शिक्षण घेत नसावा, इतर कोणत्याही कौशल्य प्रशिक्षणात नसावा किंवा नोकरीत नसावा.) निवड झालेल्या उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. या कालावधीत त्यांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाणार आहे. विमा संरक्षण: प्रशिक्षणार्थ्यांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’चे संरक्षणही मोफत दिले जाईल.
सहभागासाठी इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. तेथे ‘रजिस्टर / लॉगिन’ (Register / Login) या टॅबवर क्लिक करून आपली नोंदणी मुदतीच्या आत पूर्ण करावी. ज्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत उमेदवारांची भरती करावयाची आहे, अशा उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार (ITI Campus), नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी व समन्वयासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचे जिल्हा समन्वयक नितीश मुरकर (मो. ७९७२९१४८४६) आणि पांडुरंग कानडे (मो. ८४२१२४१३३१) यांच्याशी थेट संपर्क साधता येईल.



