सीमेवरील जवानांसाठी रत्नागिरी नगरपालिका शाळा क्रमांक १९ आंबेशेतमधील विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

रत्नागिरी : नगरपालिका शाळा क्रमांक १९ आंबेशेत शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त देशाच्या सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या भारतीय जवानांप्रती प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वनिर्मित राख्या तयार केल्या. या राख्या डाक विभागातील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. डाक विभागामार्फत या राख्या देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ‘देशरक्षण करणाऱ्या जवानांप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता’ हा संदेश दिला. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा रक्षाबंधन सण. या सणानिमित्त देश सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना आंबेशेत शाळेच्या वतीने राख्या पाठविण्याचा हा उपक्रम राबविण्यासाठी आंबेशेत शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे, उपशिक्षक विनय कांबळे, उपशिक्षिका वर्षा म्हादे, शुभम पेटकर आदी शिक्षकांनी बहुमोल परिश्रम घेतले. रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १९ आंबेशेत शाळेच्या वतीने हा उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामस्थ, पालकांनी कौतुक केले आहे.

(छायाचित्र सौजन्य : दिनेश पेटकर)



