राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर; ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहन

रत्नागिरी : राज्य शासनाच्यावतीने यंदा राज्यस्तरावर सार्वजनिक उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसाठी पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेली किंवा स्थानिक पोलीस प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची रीतसर परवानगी घेतलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत पात्र असतील. अर्ज करण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ganeshostav.pidmka.co.in या अधिकृत संकेतस्थळावर ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
मूल्यमापनाचे निकष व गुणांकन (एकूण १०० गुण)
मंडळांची निवड ५ प्रमुख निकषांवर केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येकी २० गुणांचा समावेश आहे. त्यासाठी कलांचे जतन व संवर्धन (२० गुण), संस्कृतीचे जतन व संवर्धन (२० गुण), निसर्ग आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण व संवर्धन (२० गुण), सामाजिक कार्य (२० गुण), गणेशोत्सव आयोजनातील विधायकता व शिस्त (२० गुण) यांचा विचार केला जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयाखाली गठीत तालुकास्तरीय समित्या प्रत्यक्ष गणेशोत्सवादरम्यान मंडळांना भेटी देतील. मूल्यमापनासाठी मंडळांच्या सन २०२५ च्या अनंत चतुर्दशीपासून ते सन २०२६ च्या अनंत चतुर्दशीपर्यंतच्या वर्षभरातील कार्याचा विचार केला जाईल. भेटीदरम्यान मंडळांनी कामाचे फोटो, अहवाल व व्हिडिओग्राफी सादर करणे अनिवार्य आहे.
तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाच्या एका मंडळास २५ हजार रोख व प्रमाणपत्र, तर जिल्हा स्तरावरील प्रथम तीन क्रमांकाला अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये असे बक्षीस दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या विधायक उपक्रमांची नोंद करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



