मुख्य बातमी

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प २ अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधनी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक स्थानिक उमेदवारांनी ११ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

रिक्त पदांची ठिकाणे : अंगणवाडी सेविका- ओरी आणि मालगुंड रहाटाघर. अंगणवाडी मदतनीस – ओरी देणवाडी, नेवरे बाजारपेठ, गणपतीपुळे केदारवाडी, गंडनरळ आणि नांदीवडे जि.प.

पात्रता व निकष : शैक्षणिक पात्रता: दोन्ही पदांसाठी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (पदवीधर, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड. असणाऱ्यांना प्राधान्य/गुणांकन). किमान १८ ते कमाल ३५ वर्षे (विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे). उमेदवार संबंधित महसुली गाव, वाडी किंवा वस्तीतील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. कमाल २ हयात अपत्ये (लहान कुटुंब नियम). जातीचा दाखला, किमान २ वर्षांचा अनुभव, MSCIT संगणक प्रमाणपत्र अथवा विधवा/अनाथ असल्यास संबंधित दाखले अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपले विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी २, शंकेश्वर पार्क, बी विंग, रूम नं. ७, जिल्हा परिषद शेजारी, रत्नागिरी’ या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

खाडाखोड असलेले, अपूर्ण किंवा मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी शासकीय सुट्टीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५) कार्यालयाशी संपर्क साधता येईल. निवडीचे गुणांकन ३० जानेवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!